ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in | हेल्पलाईन - +917066 951951, सोम-शनी (09:30am to 05:30pm)
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना सरकारचा एक भाग बनण्याची संधी देतो. त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होते. त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती वाढते. या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांचा दृष्टिकोन विस्तारतो.
1. उमेदवाराचे वय अर्ज सुरू झाल्याच्या पहिल्या दिनांकास म्हणजे 8 मे, 2026 रोजी किमान २१ ते कमाल २६ वर्ष या दरम्यान असावे. दिनांक 08 / 05 / 2000 ते दिनांक 08 / 05 / 2005 या दरम्यान (दोन्ही दिवस अंतर्भूत) जन्मलेल्या व्यक्ती मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, २०२६ साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
2. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण) असावा.
3. उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप / आर्टीकलशिप अनुभवाच्या कार्यकाळात गणली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल.
4. मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
1. फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून १२ महिने राहील. सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलोंवर बंधन असेल.
2. निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल.
3. प्राधिकरणावरील नेमणुकीचा/प्लेसमेंटचा निर्णय अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत घेतला जाईल. फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल.
4. नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील. यास फिल्ड वर्क असे संबोधले जाईल.
5. फिल्ड वर्क सोबतच आयआयटी बॉम्बे, मुंबई यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोंवर असेल.
6. फिल्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र मिळेल.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना शासनाचा भाग बनून काम करण्याची संधी देतो. फेलोंच्या नाविन्यपूर्ण कल्पनांची प्रशासनास मदत होते. फेलोंचा उत्साह व तंत्रज्ञानाची समज यामुळे प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान व अनुभव यामुळे तरुण फेलोंचा दृष्टिकोन विस्तारतो.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची सुरुवात २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री फेलोशिप, २०२६ चा कालावधी १२ महिन्यांचा आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया दिनांक ८ मे २०२६ रोजी सुरू होत आहे.
अर्ज करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र व इतर कागदपात्रांच्या मूळ प्रतींची आवश्यकता नसते. या कागदपत्रांमधील माहिती अर्ज करताना भरावयाची असते. मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे मुलाखतीच्या दिवशी तपासली जातात. मूळ कागदपत्रे व दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यास उमेदवाराला निवड प्रक्रियेतून बाद केले जाऊ शकते वा त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते.
फेलो थेट वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतील. हे अधिकारी फेलोंना मार्गदर्शन करतील. या अधिकाऱ्यांसोबत फेलोंचा वारंवार संवाद होईल, फेलोज त्यांना आपल्या कामाबद्दल अवगत करतील. फेलोंना आपला मासिक अहवाल संबंधित अधिकारी तसेच अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयास सादर करावा लागेल. संचालक, अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय दर ३ महिन्यांनी फेलोंच्या कामगिरीचे मूल्यमापन करतील. मा. मुख्यमंत्री वर्षातून दोन वेळा फेलोंच्या कामकाजाचा आढावा घेतील.
प्रत्येक फेलोच्या कामाचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यांच्या प्लेसमेंट नुसार व ते ज्या कार्यालयासोबत किंवा अधिकाऱ्यासोबत काम करतात त्या प्रमाणे त्यात बदल होतो. एखाद्या चालू असलेल्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत मदत करणे, एखाद्या प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणी, प्रकल्पाचे संनियंत्रण, शासकीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा किंवा धोरण निर्मिती अशा विविध स्वरूपाचे काम फेलोज करतात. कामाच्या स्वरूपानुसार फेलोशिपच्या संपूर्ण कार्यकाळात फेलो एका प्रकल्पावर किंवा एका पेक्षा अधिक कार्यक्रमांवर काम करू शकतो. यापूर्वी विविध प्राधिकरणांसोबत काम करणाऱ्या फेलोंनी एकत्र येऊन आपल्या नियमित कामकाजा व्यातिरिक्त नाविन्यपूर्ण प्रकल्प व धोरणात्मक प्रस्ताव शासनास सादर केले होते.
कोणत्याही शाखेचा प्रथम वर्ग पदवीधर फेलो म्हणून काम करू शकतो. आत्मविश्वास, नेतृत्त्व गुण, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक कौशल्य, संवाद कौशल्य आणि विविध घटकांसोबत काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये फेलोंकडे असणे अपेक्षित आहे. निवडीचे निकष वगळता इतर निकषांचा (जसे लिंग, लैंगिकता, वैवाहिक स्थिती, सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी, व्यवसाय, अपंगत्व, ग्रामीण पार्श्वभूमी) फेलोंच्या निवडीवर कोणताही परिणाम होत नाही.
आयआयटी बॉम्बे, मुंबई फेलोंना प्रभावी धोरण निर्मितीसाठी आवश्यक साधने व पद्धती यांचे प्रशिक्षण देईल. फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सर्व फेलोंना या प्रशिक्षण कार्यक्रमांना हजर राहणे व ते यशस्वीरित्या पूर्ण करणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांचा तपशील योग्य वेळी दिला जाईल. या प्रशिक्षण कार्यक्रमाशिवाय, महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत संवाद व विविध संस्थांना भेटींचे आयोजन केले जाते. या संवाद व भेटींच्या माध्यमातून फेलोंना खूप काही शिकता येते. फेलोंना प्रत्यक्ष प्लेसमेंटच्या ठिकाणी करावयाच्या कामासाठी प्रशिक्षण दिले जात नाही. याचे कारण म्हणजे, प्रत्येक फेलोचे प्लेसमेंट नुसार बदलणारे कामाचे स्वरूप. संबंधित प्राधिकरणाची गरज व फेलोची कौशल्ये यावर कामाचे स्वरूप ठरते. फेलोंनी काम करताकरता शिकणे अपेक्षित आहे. संबंधित अधिकारी फेलोंना मार्गदर्शन करतात.
शासनासारख्या महत्त्वाच्या व विशाल यंत्रणेसोबत काम करण्याचा अनुभव हा अत्यंत दुर्मिळ व एकमेवाद्वितीय असा असतो. फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून फेलोंमध्ये विविध कौशल्ये वाढीस लागतात. यामध्ये व्यवस्थापन कौशल्ये, संवाद कौशल्ये, साधन संपन्नता, प्रश्न सोडविण्याचे कसब यांचा समावेश होतो. या अनुभवातून फेलोंना शैक्षणिक व करिअर संबंधातील अनेक संधी उपलब्ध होतात. प्रशासकीय सेवा, सार्वजनिक धोरण, धोरण निर्मिती, व्यवस्थापन, कन्सल्टन्सी, सामाजिक क्षेत्र हे करिअरचे काही पर्याय आहेत.
उमेदवारास मूलभूत व्यावसायिक अनुभव आहे आणि त्याने कामाच्या ठिकाणी काही प्रत्यक्ष आव्हानांचा सामना केलेला आहे हे सुनिश्चित करण्यासाठी कामाच्या अनुभवाचा पात्रता निकष ठेवण्यात आलेला आहे. अशा अनुभवाचा उपयोग उमेदवारास फेलोशिपच्या प्रारंभीपासूनच सहजपणे काम करण्यामध्ये व अर्थपूर्ण योगदान देण्यामध्ये उपयोगी ठरेल. पूर्णवेळ काम याचा अर्थ प्रति आठवडा किमान ४८ तासांचे काम. १ वर्षाच्या पूर्णवेळ कामाच्या अनुभवामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत - १२ महिन्यांची पूर्णवेळ नोकरी किंवा पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटिसशिप / आर्टिकलशिप (प्रोफेशनल कोर्सचा एक भाग म्हणून केलेली) किंवा पूर्णवेळ स्वयंरोजगार. पूर्णवेळ स्वयंरोजगाराचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत, निवड समिती सदर दाव्याचे मूल्यमापन करेल आणि/किंवा स्वयंरोजगाराच्या स्वरूपानुसार काही विशिष्ट दस्तऐवज सादर करण्यास सांगू शकेल.
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडते. पहिल्या टप्प्यात सर्व अर्जदारांना ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी (Objective Test) व निबंध चाचणी (Essay Test) देणे आवश्यक आहे. ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी ही दुसऱ्या टप्प्यासाठी पात्रता निश्चित करणारी (qualifying) चाचणी आहे. या चाचणीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 210 उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी, म्हणजे वैयक्तिक मुलाखतीसाठी (Personal Interview), पात्र ठरविण्यात येते. दुसऱ्या टप्प्यासाठी केवळ निवड झालेल्या उमेदवारांचे निबंध मूल्यमापनासाठी विचारात घेतले जातात. अंतिम निवड प्रक्रियेत उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती व त्यांनी सादर केलेल्या निबंधांचे मूल्यमापन समाविष्ट असते. या प्रक्रियेतून गुणवत्तेआधारे (merit based) एकूण 60 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येते. ऑनलाईन चाचणीची रचना तसेच अंतिम निवडीसाठी ऑनलाईन चाचणी, निबंध आणि मुलाखत यांना दिले जाणारे गुणांचे प्रमाण (weightage) या पोर्टलवरील ‘निवड प्रक्रिया’ या टॅबमध्ये नमूद केलेले आहे.
ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी आणि निबंध परीक्षा एकाच दिवशी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल. विभागीय मुख्यालये असलेल्या ६ शहरांमध्ये परीक्षा केंद्रे उपलब्ध केली जातील. (जसे - मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर). अर्जदाराला परीक्षा केंद्रासाठी 3 ठिकाणांचा प्राधान्यक्रम द्यावा लागेल. परीक्षा केंद्राचा तपशील प्रवेशपत्रावर (Admit Card) नमूद केलेला असेल. प्रवेशपत्र अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जारी करण्यात येईल.